पक्ष फुटला याची चिंता नको   

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा

पुणे  : पक्षामध्ये फूट पडेल असे कधी वाटले नव्हते. मूलभूत विचारांमध्ये फरक झाला आणि फूट पडली. फुटीची चिंता करु नका! जे पक्ष सोडून गेले ते गेले. त्यांच्याकडे पाहू नका. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुका होणार आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा २६ वा वर्धापनदिन बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.
 
पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे, याचा निर्णय जिल्हा पातळीवरील नेतृत्व घेईल. पण, ५० टक्के जागांवर महिला उमेदवार असतील. पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची स्तुती केली. मात्र, अजित पवार यांचा उल्लेख टाळला. जेव्हा मी स्वतंत्र पक्ष उभा केला तेव्हा फक्त सहा जण होते, त्यातील एक म्हणजे कमल किशोर कदम, जे अजूनही पक्षात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 
‘ऑपरेशन सिंदूर’मधील दोन महिला अधिकार्‍यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी सर्वच पक्ष उभे राहिले, असे नमूद केले. पण, त्याचवेळी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. सध्याचे पंतप्रधान वेगळ्याच पद्धतीने काम करत आहेत. शेजारी राष्ट्र चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकासोबत चांगले संबंध नाहीत. याउलट, माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या काळात शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध होते, अशी आठवणदेखील त्यांनी करुन दिली.पवार पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांत पक्षातर्फे ५० टक्के तिकिटे महिलांना दिली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून याची सुरुवात होईल.  
 
सत्तेची चिंता करू नका, सत्ता येते आणि जाते. पक्षासाठी काम करत राहा. तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी द्या. त्यांनी हातात हात घालून काम करावे.  आपल्या पक्षात फूट पडली; ती पडावी, असे वाटत नव्हते. काही मूलभूत विचारांमध्ये फरक झाला आणि फूट पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील, तेव्हा वेगळे चित्र बघायला मिळेल. १९८० मध्ये माझ्या हाती सत्ता होती. त्यावेळच्या निवडणुकीत ५० ते ५२ आमदार निवडून आले. पुढच्या सहा महिन्यांत ६ आमदारच शिल्लक राहिले. बाकी सर्व सोडून गेले. त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. त्यामुळे फुटीची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

नवे चेहरे दिसले पाहिजेत

जयंत पाटील यांनी सांगितले आहे की, नव्या पिढीला संधी द्या. आम्ही सर्वांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात नवीन पिढी, नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊ, प्रतिष्ठा देऊ आणि राज्य चालवणारे नेतृत्व आपण घडवले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमास फौजिया खान, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, आमदार निलेश लंके, पक्षाच्या आमदारांसह खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डेंगळे पुलाजवळील पक्ष कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले.
 

Related Articles